रविवार, १८ एप्रिल, २०२१

पिसईचा नकटा

 पिसईचा नकटा


दूरातून कुठूनही मृदंगाचा अस्पष्ट आवाज आला तरी अॅड विलास कदम गाडी तिकडे वळवायचे . तिथे पोचून विचारायचं,” नकटा आलाय का ?” उत्तर मिळायचं ,” आत्ताच वरच्या वाडीला गेला”. की मोहरा तिकडे .पुन्हा नकटा हूल द्यायचा . दापोलीच्या आसपासच्या  वाड्या वस्त्या केवळ त्या एका नकट्यासाठी पालथ्या घातल्या. शेवटी एकदाचा नकटा त्याच्या लवाजम्यासह  करंजाणी गावात गाठ पडला.

कोकणातला शिगमो हा मानाचा महत्वाचा सण! शिगमो किंवा शिमगा म्हणजे मूळचा होलिकोत्सव-वसंतोत्सव ! दापोली गावाजवळच्या आसूदची होळी केवळ अनुभवायला हवी. संपूर्ण गाव ही होळी सामुदायिक रित्या साजरी करते .चाकरमानेही होळीसाठी गावी आलेले असतात. रांगोळ्या काढून, पताका लावून, 20/25 फुट उंचीची होळी कलात्मकरीत्या सजवली जाते. पोरटोरांपासून सगळ्यांची उत्साही लगबग वातावरणात भरून राहिलेली असते. रात्री, पूर्ण चंद्राच्या साक्षीने, होळीला नारळ-नैवेद्य होतो. गावातले पुरुष होमाभोवती फेर धरून होळीची गाणी म्हणत दंगल उडवून देतात.आणि नंतर असतो एक इवेंट. चक्क बाहुलाबाहुलीचे रीतसर लग्न! व-हाडापासून वाजंत्री-वरातीपर्यन्त, करवल्यापासून,मंगलाष्टका पर्यन्त, गाव जेवणापासून नाचगाण्यापर्यंत सगळे कसे साग्रसंगीत. आख्खा गाव त्यात सामील.  माझ्या मनात तर त्या बाहुलाबाहुलीच्या लग्नामुळे लहानपणीच्या भातुकलीच्या,  बाहुलाबाहुलीच्या लग्नाच्या nostalgic आठवणींचा पूर लोटला.इतकं सगळं अनोखं अतरंगि.

या उत्सवातला माझा एक दिवस होता काटखेळाच्या नावे.काटखेळ हा झांज पखवाजाच्या साथीने घडणारा एक समूह नृत्याचा आविष्कार !हातात काठ्या टिपर्‍या घेऊन केलेलं गरबा सदृष्य सामूहिक नृत्य. काटखेळात विवाहित पुरुषच असतात.अर्धनारीनटेश्वरा सारखा पोशाख.-म्हणजे अंजिरी, बैंगणी, आंबा अशी ऐन देशी रंगाची , जरीकाठाची लुगडी ,निर्‍या निर्‍या करून कमरेला विशिष्ट पद्धतीने बांधलेली असतात. डोईवर मावळ्यांच्या पागोट्यासारखं शिरोभूषण!

काटखेळात 40/40 जण असतात.काही गावांची देवीची पालखी असते. ज्या गावांची पालखी  नसते त्यांचा नारळ असतो. काटखेळयांचा म्होरक्या हा नारळ घेऊन , साथीदारांसोबत घरं घ्यायला निघतो. अंगण सारवून , रांगोळ्या रेखून, घरं प्रसन्न मनाने  खेळयांची वाट पहात असतात. खेळे आले की फुलांचा हार घालून, नारळाची पूजा केली जाते. मग रिंगण धरून काटखेळ होतात. खेळयांना दक्षिणा, साखर, चहा असं काही आवर्जून दिलं जातं.

दापोली तालुक्याच्या खेडी गावच्या ग्रामदैवत चंडिका देवीशी जोडलेली ही लोक कला!.कसली कोरिओग्राफी अन कसलं काय? काटखेळ  म्हणजे सगळं उपजत, उत्स्फूर्त, मुक्त, चैतन्यमय  !

काटखेळाची प्रथा शिवकालपूर्व आहे असे म्हणतात .शिव काळात गुप्त संदेशांची देवाणघेवाण काट खेळाच्या माध्यमातून व्हायची.कोकणातला हा काटखेळ प्रजासत्ताक दिनाची शोभायात्राही गाजवून आला आहे.

त्याच दिवसाची संध्याकाळ होती गोमु के नाम. दिवेलागणीला बाजारात पुन्हा तोच परिचित पखवाजाचा आवाज  आलाच. दुकानदुकानसमोर थांबून गोमू नाचत होती. “ राया मला गुलाबाचा गजरा हवा “ तरणेच काय शौकीन म्हातारे ही गोमू बरोबर ठुमकत होते. ही गोमू म्हणजे मुलगाच असतो पण नाचणं, लाजणं, लाजबाब! मनसोक्त मनोरंजन.

आता राहिला नकटा! नकट्यापाई किती भिरीभिरी फिरलो .कदम साहेबांनी माझी नकट्याशी गाठ घालून द्यायचीच असा विडा उचलला होता. आम्ही करंजाणीला पोचलो तेव्हा नकटा एक घर घेत होता. त्यांच्याच लोकभाषेत म्हणायचे तर चौथ्या, पाचव्या होळीला नकट्याचे सोंग घरे घ्यायला निघते. नकट्याच्या  कबिल्यात कोळी - कोळिणीची  जोडी, गायक, वादक असतात. अर्थात गोमू सारखाच कोळिण पण मुलगाच असतो॰

नकटा म्हणजे देवीचा रखवालदार,. आम्हाला भेटला तो महामाई देवीचा रखवालदार. “पिसईचा नकटा”!नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ति  एक पारंपारिक लाकडी मुखवटा घालते .काजुच्या झाडाच्या खोडापासून हा मुखवटा बनवलेला असतो . नकट्याचा मुखवटा पोरा - बाळांना भीतीदायकच  वाटतो. करंजाणी  गावात ज्या घरासमोर नकटा नाचत होता , तिथली पोरं भेदरून आईच्या पदराआड दडून पहात होती. सांगलीला अशीच तडकड ताई येते . तिला मी अशीच घाबरायची.

नकटा गाण्याच्या टाळावार, गाण्याबर हुकुम अभिनय करून, हातातली कोयती गरागरा फिरवत नाचत होता.

नकटा बामण दिसतो कसा

नकटा बामण  चालतोय  कसा

उंबराखाली खटीला डुरा

दुरूच्या चष्म्याला लागला झरा

उठा उठा पंतोजी आंघोळी करा

आंघोळीकरता देखलाय मासा

तोडलाय जानवा, फेकलाय मासा

फाशात मासा गुंतलाय कसा

हातात फासा डोईवर मासा .

नकटा बामण  चालतोय  कसा

घराघरा समोर नकट्याचे सोंग नाचते . घरातल्या तान्ह्या मुलाला नकट्याच्या हातून आंघोळ घातली की इडापीडा तळते अशी भोळीभाबडी समजूत असते. नकट्याला खूप मान असतो घर घेतलं की त्याचा, त्याच्या साथीदारांचा, नारळ देऊन साग्रसंगीत मानपान केला जातो.

कित्येक लोककला,लोकपरंपरा  नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .तशीच नकट्याच्या सोंगाची प्रथाही थांबते का काय अशी परिस्थिति होती . “पिसईचा नकटा म्हणून वसंत गोविंद  एसरे  वर्षानुवर्ष सोंग काढायचे. त्यांना आता वयामुळे जमत नाही. पण त्यांची धुरा संदेश काटकर या नवयुवकाने कर्तव्य भावांतून, सामाजिक बांधीलकीतून खांद्यावर घेतली आहे.नकट्याच्या ताफ्यात एसरे, बाईकर कुटुंबातले लोक, गायक, वादक म्हणून आहेत..नकट्याचे सोंग निघते तेव्हा गावाच्या सीमेबाहेर आधी कोकणी खासीयतीप्रमाणे गार्‍हाणे घातले जाते.” व्हय म्हाराजा, तुझ्या खेळ्यांसाठी पोरं बाहेर पडलीत. नीटपणाने तडीस जाऊ दे. पोरांच्या मागे उभी रहा. व्हय म्हाराजा”

मगच खेळे बाहेर पडतात. खेळे करायचे दिवस संपले की नकट्याचा कबिला घरी परतायला निघतो. पुन्हा गावच्या सीमेवर देवीचे पूजन होते. पुन्हा गार्‍हाणे घातले जाते. देवीने पाठराखण केली म्हणून देवीचे ऋण  व्यक्त करायला. “तुझ्या नावाने बाहेर गेली होती, त्यांना सुखरूप आणलास म्हणून आमचा नमस्कार मान्य कर...व्हय म्हाराजा”

 मग बोंम्ब मारत होमावर जायचे,खेळ्याची सांगता साणेवर  होते. साण किंवा सहाण  म्हणजे चावडी सारखी जागा. इथे दूर जंगलातल्या पालख्या जमतात. नकटा गावातून बाहेर पडताना साज चढवून बाहेर पडलेला  असतो. तो साज साणेवर उतरला जातो. देवीची ओटी भरली जाते. वाड्या वस्त्यांवरच्या पालख्या नाचवल्या जातात . शेवटी प्रसादाने सांगता होते.

शिमग्यातले खेळ, नाच, सोंगं ही सगळी समूह मनाची , समूह प्रतिभेची निर्मिती असते . ग्रामीण भागात लोककला दैनंदिन जीवनाचा एक  अविभाज्य  भाग असतात. लोक कलांमध्ये निसर्गत:  एक जोश, उत्स्फूर्तता , मुक्तपणा  असतो . कलात्मक सौंदर्यनिर्मिती  अशा क्लिष्ट  गोष्टी, दूरान्वयानेही  कोणाच्या ध्यानी मनी नसतात.कृत्रिम बांधिलकी नसते. पण आपोआप सौंदर्याचा, आविष्कार , साक्षात्कार घडतो.हाच लोक कलांचा प्राण!.लोक कला म्हणजे निरामय  चैतन्य, आदिम संस्कृतीचे अनमोल देणं! शहाण्याने भौतिक प्रगतिच्या मापाने या लोकसंस्कृतीची गुणवत्ता मोजू जाऊ नये....

करंजाणी हून परतताना नकट्याच्या गाण्याने मनात फेर धरलला होता ..

“आंघोळीकरता देखलाय मासा

तोडलाय जानवा, फेकलाय मासा

फाशात मासा गुंतलाय कसा

हातात फासा डोईवर मासा

© अॅड. सीमंतिनी  नूलकर




आसूदची होळी


संदेश काटकर आणि  वसंत एसरे


नकट्याचा कबिला




बाहुला बाहुलीचे लग्न



काटखेळ


 

 

४ टिप्पण्या: