मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

चित्तो जेथे भयशून्यो ....

 वार्‍यावर लहरणारा तिरंगा पाहून कोणाही  भारतीयाची मान अभिमानाने उंचावते .भारतीयांच्या आत्मसन्मानाची निजखूण, भारतवर्षाचे मानचिन्ह म्हणजे तिरंगा .भगवा, पांढरा, हिरवा हे तिरंग्याचे तीन रंग म्हणजे धैर्य, त्याग,आशा, समता, शुद्धता, शांती, श्रद्धा , सौजन्य, न्याय अशा गुण समुच्चयाचे प्रतिकच.मधोमध  24 आरे असलेले अशोक चक्र जीवनाची गतीमानता दर्शवणारे. पिंगली वेंकय्या यांनी सुचवल्या पेक्षा  तिरंग्याचे अंतिम स्वरूप वेगळे असले तरी पिंगली वेंकय्या या स्वातंत्र्य सेनानीला भारताच्या राष्ट्रध्वजाचे  डिझाईन करण्याचे श्रेय जाते.22/7/1947 ला राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले   आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र भारताचे प्रतीक असलेला तिरंगा फडकला.

कोणाही राष्ट्राचा राष्ट्रध्वज त्या त्या राष्ट्राचा इतिहास, समृद्ध संस्कृती, जैव विविधतेची  वैशिष्ट्ये, अशा कशा न कशा चा  वारसा  अधोरेखित करतो.ध्वज प्रथेचे मूळ भारतीय उपखंडातच सापडते. भारत आणि चीन हे त्या प्रथेचे मानकरी.पूर्वी युद्ध क्षेत्रात  रथांवर, हत्तीवर ध्वज असायचे.युद्धात या ध्वजांचा पाडाव हेच लक्ष्य असायचे. हळू हळू स्वतंत्र राज्य, स्वतंत्र राष्ट्राचे  प्रतीक म्हणून ध्वजानासन्माननीय  स्थान मिळाले.

कोणताही राष्ट्र ध्वज हा त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे, आत्मसन्मानाचे, अस्मितेचे , गौरवाचे मानचिन्ह  असते. राष्ट्राच्या अशा मान चिन्हा कडे तितक्याच गांभीर्याने पाहिले पाहिजे. 

स्वातंत्र्य दिन किंवा प्रजा सत्ताक दिनाच्या वेळी भारतात ध्वजारोहण दिमाखात, उत्सवी, उत्साही स्वरुपात पार पडते. पण कधी   कधी अति उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाच्या अवमानांच्या घटना घडतात. न्यायालयात खटले दाखल होतात. कधी समाज विघातक शक्ति   तिरंग्याचा जाणीवपूर्वक अपमान, अवहेलना  करतात॰ कधी सामान्य नागरिकाकडून अनावधानाने अवमान होतो.

अशा अनेक न्यायालयीन निकाल पत्रात  राष्ट्रध्वजाचे महत्व , ध्वजारोहणाची  पद्धत, अधिकार, राष्ट्रध्वजाचा अवमान यांची विस्ताराने चर्चा झालेली आहे.एका निकाल पत्रात विशेषत्वाने नमूद केले आहे कि सर्व सामान्य जनतेत राष्ट्र ध्वज, राष्ट्र ध्वज संहिता याबाबत जन जागृतीची निकडीची गरज आहे.राष्ट्रध्वज हा भारतीय राज्य घटनेचा दूत आहे आणि घटनेचा, राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.

 

तिरंग्याची निर्मिती प्रक्रिया हा विषय थोडा खोलात जाऊन पाहिला तर त्या मागचे गांभीर्य समजते. तिरंग्यासाठी, रेशीम, लॉकर ,खादी अशा नैसर्गिक सुताच्या कापडाचा वापर अनिवार्य असतो. हुबळी(कर्नाटक)  येथील खादी ग्रामोद्योग संघा कडे तिरंग्याच्या निर्मितीची महत्वपूर्ण  जबाबदारी आहे. म्हणू च हुबळीला   ध्वज ग्राम  म्हटले जाते. 

तिरंगा शिलाई साठी विशिष्ट तांत्रिक कौशल्य, क्षमता, पात्रता, आवश्यक असते. तिरंग्याच्या कापडाची निर्मिती बागलकोट येथे होते. तर ध्वज स्तंभा ला  ध्वज अडकवण्याची रोप हेम कोलकाताहून येते.. तिरंग्याचे रंग, शिलाई , ध्वजारोहणासाठी आवश्यक व्यवस्था, अशा अनेक बाबींना हुबळी येथे मूर्त स्वरूप येते. तिरंग्याचे रंग, आकार इतकेच नव्हे तर एक स्क्वेर सेमी कापडातील उभ्या आडव्या धाग्यांच्या विणींची संख्या, यात कुठेही चूक होणे हा गंभीर गुन्हा आहे.

ध्वजासाठी वापरल्या जाणार्‍या  कापडाच्या प्रत्येक चौरस सेमी मध्ये, चार उभे, चार आडवे, अशी विशिष्ट वीण बंधनकारक आहे.ही वीण अतिशय दुर्मिळ प्रकारची असते. तिरंग्याचा आकार आयतकृती,  आणि लांबी रुंदी, 3:2 अशा मापातच असते. 

तिरंग्याचे साधारण नऊ साइज असतात. राष्ट्रपतीभवन,राजभवन, विधान  सौध, पुलिस हेड क्वार्टर अशा ठिकाणी राष्ट्र ध्वज फडकावला जातो. त्याचे मोज माप , कापडाचा प्रकार याची माहिती कित्येक सरकारी अधिकार्‍यांना ही नसते. 3600mm/2400mm हा दोन क्रमांकाचा साइज असलेला राष्ट्रध्वज लाल किल्ला , राष्ट्रपति भवन, गन  कॅरेज  यावर  फडकावला जातो.सगळ्यात लहान साइज 150mm/100mm आहे. एक नंबर साईजचा राष्ट्र ध्वज अति उंच इमारतींवर फडकावला जातो.

राष्ट्रध्वज निर्मिती, ध्वजारोहण, सन्मान यासाठी भारताची स्वतः ची राष्ट्र ध्वज संहिता आहे.....Flag Code of India.

राष्ट्रध्वजाच्या अवमानविषयक तरतूदिंबाबत  Prevention of Insult to National Honour Act,  Emblem and Names ( Prevention of  Improper Use) असे कायदे आहेत.पूर्वी ध्वजारोहणाचा अधिकार सामान्य नागरिकाला     नव्हता.पण नवीन जिंदाल केस मधल्या निकालपत्रानुसार   सर्व सामान्य नागरिकाला सुद्धा हा अधिकार मिळाला.पण हा अधिकार निरंकुश (absolute)असा नाही तर qualified  right  आहे... निरंकुश अधिकार या साठी केलेला नाही कि,अन्यथा  कुठल्याही मिरवणुका,    मोर्चे ,सभा  अशा प्रसंगी राष्ट्रध्वजाचा अनिर्बंध, सरसकट वापर होऊन, राष्ट्रध्वजाचा अपेक्षित सन्मान राखला जाणार नाही.  

ध्वजारोहणाचाही एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे.राष्ट्रध्वज सहसा सूर्योदय ते सूर्यास्त या काळात फडकत रहाणे अभिप्रेत आहे.सूर्यास्ताच्या सुमारास तो सन्मानपूर्वक उतरवणे आवश्यक असते,राष्ट्रध्वज रात्रीही फडकत ठेवायचा असेल तर संपूर्ण प्रकाशाची व्यवस्था असायलाच हवी.आणि ध्वजस्तंभ 100 ft उंच असणे ही या परिस्थितीत गरजेचे असते.

ध्वजारोहण करताना भगवा रंग अनिवार्यपणे वरच असला पाहिजे .उलटा राष्ट्रध्वज फडकावणे हा गुन्हा आहे.राष्ट्रध्वजाची घडी घालण्याची ही एक विशिष्ट रीत, पद्धत  आहे . राष्ट्रध्वज कधीही टेबल क्लॉथ म्हणून, पोडियम वर घालण्यासाठी म्हणून, इमारत झाकण्यासाठी किंवा कशावरही आवरण म्हणून वापरता येत नाही .ध्वजारोहणाचे वेळी वापरल्या जाणार्‍या  फुलाच्या पाकळ्या वगळता अन्य काहीही ध्वजात गुंडाळून ठेवता येत नाही.राष्ट्रध्वज कधीही जमिनीला टेकता कामा नये. जाणीवपूर्वक पाण्यात सोडून देता कामा नये.कमरेखाली वस्त्रा सारखा  किंवा अंतरवस्त्रावर  वापरता येत नाही. मलिन किंवा फाटलेला ध्वज लावता येत नाही.असा ध्वज सन्मान पूर्वक नष्ट करावा लागतो ॰

राष्ट्रपति, पंतप्रधान, चीफ जस्टिस अशा विशिष्ट अति महत्वाच्या व्यक्तींनाच गाडीवर ध्वज लावण्याचा अधिकार आहे.प्लॅस्टिक ध्वजांचे एक फॅड आले होते .प्लॅस्टिक एकतर सहजासहजी नष्ट होत नाही आणि मग ते ध्वज  पायदळी  जातात. ते टाळणे आवश्यक आहे.राष्ट्रध्वजाचा व्यावसायिक वापर करता येत नाही.सभास्थळी राष्ट्र ध्वज लावायचा असेल तर तो वक्त्याच्या उजव्या हाताला असावा    असा  दंडक आहे.राष्ट्रध्वजावर नक्षीकाम करणे, लिहिणे गुन्हा आहे.राष्ट्रध्वजाच्या अवमाना साठी तीन वर्षापर्यंत  तुरुंगवासाच्या शिक्षेचे प्रावधान  आहे.

शहिदांना अंतिम निरोप देताना , त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटलेले आपण पहातो . त्यामागे कारण असे आहे कि त्या जवानाने राष्ट्रहितार्थ , संरक्षणार्थ selfless  service  दिलेली असते.,प्राणांची बाजी लावलेली असते.. त्यासाठी हा सन्मान. परंतु शहिदाच्या पार्थिवावर  लपेटलेला तिरंगा कधीही पार्थिवासोबत नष्ट केला जात नाही. अंतिम संस्कारा वेळी सन्मानपूर्वक काढून घेऊन, विशिष्ट प्रकारे घडी घालून शहिदाच्या  आप्तस्वकीयांकडे सुपूर्त केला जातो.

काही वेळा बिगर लष्करी  नागरिकाच्या पार्थिवला तिरंग्यात लपेटलेले पाहिल्यावर अनेक शंका कुशंकाना उधाण येते . श्रीदेवी चे पार्थिव तिरंग्यात लपेटले म्हणून खूप वादंग झाले होते. परंतु तिचे भारतीय चित्रपट सृष्टीला मोठे योग दान आहे.  चित्रपट हे भारतीय संस्कृतीचे एक अंग आहे. कलाकाराने दिलेल्या योगदानाचा तो सन्मान असतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

राष्ट्र ध्वज म्हणजे उंच स्तंभावर वार्‍यावर लहरतो तो, इतकाच मर्यादित अर्थ राष्ट्र ध्वज या संज्ञेचा नाही.या संज्ञेत राष्ट्रध्वजाचे चित्र, पेंटिंग,फोटो, किंवा दृश्य स्वरुपातील representation   याचाही समावेश आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान म्हणजे, राष्ट्र ध्वज सामुहिकरीत्या जाळणे, भ्रष्ट करणे, फाडणे, तुडवणे, त्याचे विकृतीकसरण करणे या कृतींचा समावेश होतो. लिखित स्वरुपात किंवा वाणीद्वारे अवमान ही गुन्हा आहे.अलीकडेच एका ऑनलाइन शॉपिंग साईट ने तिरंग्यासारखी पायपुसणी बाजारात आणली मात्र सख्त आदेशानंतर माघार घेतली.

राष्ट्रध्वजाचे डिजाइन करताना , रंग संगती ठरवणे , त्या राष्ट्राचा इतिहास संस्कृती याचे संदर्भ वापरणे असे खूप काही  असते. राष्ट्र ध्वज संहिता  आणि तत्संबंधी सर्व पैलूंच्या अभ्यासाची एक शाखा आहे . तिला VEXILLOLOGY  म्हणतात. हा शब्द मूल लॅटिन शब्द VEXILLUM म्हणजे बॅनर , यावरून प्रचलित झालेला आहे.राष्ट्रध्वजाचा अभ्यास किंवा माहिती करून घेणे अतिशय मनोरंजक आहे. 

राष्ट्रध्वज सहसा आयतकृती असतात पण स्वीत्झर्लंड, वॅटिकन सिटि चे मात्र चौकोनी  आहेत.तर नेपाळचा त्रिकोणी आहे.

अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजात तीन रंगांचा वापर जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यात ही  पांढरा, लाल, केशरी, नीळा हे रंग अधिक दिसतात.पण पर्पल  रंग मात्र नसतो. एकेकाळी हा रंग तयार करणे आत्यंतिक खर्चिक बाब होती म्हणून असावे कदाचित. 

भारताच्या राष्ट्रध्वजाला आपण कौतुकाने तिरंगा म्हणतो पण थायलंड चा सुद्धा" ट्राय रोंग " आहे, बलगेरिया चा Balgarski Trikolyor   आहे. अशीच अनेक देशांच्या  ध्वजांची लाडकी अनऔपचारिक   नावं आहेत. कुवेत चा "DERTI "म्हणजे   My  Land/My  Nation. नेपाळचा "पहाडी "तर जपानचा" Hinomaru किंवा Nisshoki."

आपापला राष्ट्रध्वज प्रत्येकाला आवडतो च  पण काही तर फार सुरेख आहेत. Fernleaf  असलेला  New zealand चा, Maple leaf  असलेला कॅनडाचा   अगदी देखणे आहेत.तुर् मेनिस्तानच्या  ध्वजावर अतिशय नाजुक नक्षी आहे तर hongkongच्या ध्वजावर Bauhinia   blackeana  या orchid ल स्थान मिळाले आहे.

तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृत होण्याच्या वेळी घटना समितीत अनेक चर्चा झाल्या. राष्ट्र ध्वज म्हणजे काय यावर तज्ञांनी मते मांडली. पंडित गोविंद मालविय म्हणतात तस राष्ट्रध्वजाचे रंग, आकार किंवा अन्य गोष्टी महत्वाच्या नसतात. एखादा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृत होतो  तेव्हा तो राष्ट्राच्या गौरवाची , अभिमानाची, अभिव्यक्ती असते.त्या राष्ट्राच्या स्वतंत्रतेची ग्वाही असते. 

पूर्व राष्ट्रपति  आर वेंकटरामन यांनी "Our  National  Flag " या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले,आपला राष्ट्रध्वज हा एक आशीर्वाद ( Benediction)आहे.एक मार्गदर्शक  बिन्दु  Becon  आहे.राष्ट्रध्वज म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात ज्या वीरांनी आहुति दिली त्या महान  आत्म्यांचे  आशीर्वाद आणि एक न्यायप्रिय, एकसंध भारताचे स्वप्न पूर्णत्वाला नेणारा मार्गदर्शक मानबिंदू.

धर्म , जात, लिंग, या पलीकडे जाऊन शांततामय सहजीवनाची पुनर्स्थापना  होण्यासाठी एक समर्पित भावना सतत जागति राहावी यासाठीच राष्ट्रध्वज असतो. रबीन्द्रनाथ टागोरांची गीतांजली मध्ये एक कविता आहे  

"चित्तो  जेथे भयशून्यो ."

 स्वतंत्र जागृत नवभारताबद्दल चे स्वप्न सांगणारी ...

"जिथे शब्द सत्यतून अवतरतील,

जिथे तारतम्य नाश्ता झालेले नसेल,

जिथे चित्त भयशून्य असेल..."

अशा आशयाची .

प्रत्येक भारतीयाचे" भयशून्य चित्ताचे स्वप्न" तिरंग्याच्या छत्रछायेतच आहे.



Adv Seemantini Noolkar




1 टिप्पणी: