शनिवार, २७ जून, २०२०

काजुल्याचे झाड

                                काजुल्याचे झाड

 एकदा असंच मोसमी पावसाच्या आधी, मे महिन्याच्या शेवटी-जूनच्या पहिल्या आठवड्याच्या सुमाराला, महाबळेश्वरवरुन अंधार पडता पडता सातार्‍याला येत होते.मेढा-केळघर घाटात दर्‍याखोर्‍यातून झाडांवर चिमुकले दिवे लुकलुकताना दिसायला लागले.एखाद्या कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असते तेव्हा दिव्याच्या माळा कुठे सोडायच्या , लावल्यावर कशा दिसतील, याची चाचपणी चालू असते,उत्साही मंडळींची लगबग चालू असते, तसा काहीसा माहौल होता . कुठेतरी एखाद्या झाडावर काजव्यांची प्रकाश लकेर दिसता दिसता विरून जात होती.कुठे शेकोटीतल्या निखर्‍यावरून ठिणग्या उसळाव्या तशा उसळत होत्या."काजुल्यांची झाडे"बहराला आलेली होती॰ कोकणात काजव्याना लाडाने  'काजुले'म्हणतात   आणि काजव्यांनी लगडलेली झाडं म्हणजे "काजुल्यांची झाडे"॰

 रात्र चढता चढता वाहतूक कमी होत गेली तशा काजव्यांच्या झुळकांवर झुळका याला लागल्या. मिट्ट काळोख, ओथंबलेलं आभाळ आणि गार वारा--हळू हळू नीरव शांततेनं आसमंताला घेरून टाकलं आणि आतिषबाजी  रंगात आली." सिंक्रोनाईज्ड फ्लॅशिंग "सुरू झालं.काजव्यांचे cलुकलुकण्याचे पॅटर्न वेगवेगळे असतात."सिंक्रोनाईज्ड फ्लॅशिंग" हे दक्षिण आशियाचे वैशिष्ट्य आहे..वार्‍याचा जोर कमी आला की फ्लॅशिंगला ऊत यायचा.काजव्यांनी झाडं धरली होती.एकेक झाड झपकन पेटायचं-विझायचं.कुठे घोळक्या घोळक्यांनी performance चालू होता, कुठे सोलो!

रानवाटांवर दोहीकडेला अनार लावल्यासारखे वाटतेय म्हणेपर्यंत उल्का पडताना दिसते तसा एक अकेला काजवा दरीत झेपावत हाराकिरी करताना दिसत होता. डोळ्यांपुढे काजवे चमकण म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर असा काजव्यांचा दीपोत्सव पहायलाच हवा.एका पुलावरचं झाड तर काजव्यांनी इतकं बहरलं होतं की,चहूअंगांनी फिरूनही समाधान होईना . Bird's eye view तर शक्य नव्हता. Worm's eye view तरी घेऊ म्हणून पुलाच्या कठड्यावर आडवं पडून दृष्टीसौख्य घेतलं. 

जे नजरेसमोर घडत होतं ते कॅमेर्‍यात पकडण्याला अर्थ नव्हता .ज्यांना कॅमेर्‍यात पकडायचं ते एकतर लुकलुकत, भरारत होते आणि फोटोत तो मस्त गार वारा ,जंगलाचा वास, आकाशाची गोलाई ,निळाई काहीच येणार नाही. 

मान्सून पूर्व काळ हा काजव्यांच्या प्रियाराधनाचा काळ.अवघा 8/15दिवसांचा.या काळात नर काजवे लुकलुकत इकडे तिकडे भरार्‍या मारत मादी काजव्यांना हेरायचा, आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पूर्वमोसमी हवा काजव्यांच्या romance ला मानवते.एखादी पावसाची हलकी सर येऊन गेली असेल तर नजारा काही औरच असतो. काजवा ही चीजच अशी आहे की प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणींच्या कुपित काजवा असतोच.प्रत्यक्ष पाहिलेला आणि परिकथेतला सुद्धा !तामिळनाडू जवळच्या कोसवनपालयम सारख्या खेड्यातली मुलं बाटलीत काजवे भरून त्याचा जादुई दिवा टांगून प्रकशाच्या खेळाची मजा लुटतात तर इंग्लंड अमेरिकेतली मुलं nursery rhyme म्हणतात,
 
Lady bug, fly away home 
 Your house is on fire
 Your children will burn'
 (हे बडबडगीत किंवा Humpty dumpty , Rock a bye baby, Jack and Jill, बालगीतं असून त्यात कुणी तरी पडलं, गडगडत आलं, असे विध्वंसक विचार का असा एक जाता जाता प्रश्न आला मनात). 

 देश कुठलाही असो काजवा हवाच . देशोदेशी काजव्याना वेगवेगळी नावं आहेत..संस्कृत मध्ये त्यांना खद्योत म्हटलय तर कुठे त्याला इंद्राचा गुराखी म्हणतात . चीन मध्ये तो फुलपरी(Flower Lady) म्हणवतो तर इराण मध्ये त्याला' गुड न्यूज' हा किताब बहाल आहे. काजव्यांवर म्हणी तर खूप मजेदार आहेत."काजवे स्वतः पुरता प्रकाश देतात" अशी नकारात्मक दृष्टीकोन असलेली म्हण आहे तर "काजवे उडत असतात तेव्हाच प्रकाशमान असतात" अशी एक म्हण आहे . जपानी म्हण आहे की,"गाणारे सीकाडा ( एक प्रकारचा कीटक )तग धरून रहातात पण अबोल बिचारे काजवे जाळून खाक होऊन जातात." 

 काजव्यांची सामान्य माणसाला तशी कमीच माहिती असते.काजवे का लुकलुकतात, केव्हा लुकलुकतात , त्यांचा काही उपयोग आहे का या बद्दल सहसा माहीत नसतं. खरं तर काजवा शेतकर्‍यांचा मित्र! कीड नाशक (pest control) म्हणून अत्यंत उपयुक्त. दूरदूरच्या खेड्यापाड्यात , जिथं वीज पोचलेली नसायची तिथल्या रात्री या काजव्यांच्या जादुई दिव्यांनी प्रकाशमान केलेल्या आहेत , ते वेगळंच! 

 काजव्यासारखं चमकण, समुद्रीजीवांमध्ये, प्रवाळामध्ये, एकपेशीय प्राण्यांमध्ये आढळतं पण या अलौकिक देणगीला सरपटणारे प्राणी,पक्षी, सस्तन प्राणी, मुकलेत.या काजव्यांच्या अंड्यांचीही गम्मत असते. ती एखाद्या बशीत गोळा करून दोन दिवस निवांत जागी ठेवायची.अंधारात बशीवर हलकी टिचकी मारली आणि तरंग लहरी उमटवल्या की ती अंडीही लुकलुकून प्रतिसाद देतात. घाट रस्ता उतरता उतरता चार दोन प्रकाश थेंब जवळच्या बाटलीत गोळा केले .घाटाची वळण ओलांडत गेल्यावर आणखीच नवल समोर आलं.रस्त्याच्या दुतर्फा थोड्या थोड्या अंतरावर जमिनीवर प्रकाश थेंब सांडलेले दिसत होते पण स्थिर प्रकाश होता. रस्त्या कडेला fluroscent रंग लावलेले पथदर्शक असतात तसे!काजवे जेव्हा जखमी होतात किंवा कोळ्याच्या जाळ्यात अडकतात तेव्हा त्यांची लुकलुक थांबून ते स्थिर प्रकाश फेकत रहातात. हे तसच काही असावं का? पण इतक्या प्रमाणात आणि ते ही रस्त्यालगत?अंधारात त्यातलाच एक दिवा उचलून बाटलीत ठेवला. थोड्या वेळाने पाहिले तर एकच प्रकाश थेंब राहिला होता ...स्थिर प्रकाश फेकणारा. टॉर्च टाकून पहिले तर दचकायला झाले, तो स्थिर प्रकाश फेकणारा म्हणजे एक 2/3 सेमी लांबीचा किटक होता . शेपटीच्या टोकाला दोन दिवे आणि मध्ये एक कळेल न कळेल अशी रेघ.अंधारात तो उचलला होता खरा पण उचलण्यापूर्वी आकार पाहिला असता तर हात थबकलाच असता. पण लुकलुकणार्‍या काजव्यांच्या मानाने त्यांची संख्या तशी कमीच होती. मादी काजवे होते का काय कळेना. मादी काजव्यांत संथ निवांतपणा होता आणि त्या लुकलुकण्याची तसदीही घेत नव्हत्या . बिचारे नर काजवे मात्र लुकलुकून,मादी काजव्याना आकर्षित करण्यात हैराण! आशियातल्या समस्त प्राणी वर्गातल्या समस्त स्त्री वर्गाची response न देण्याची खासियत असते का काय? या चपट्या काजव्यांनी माझी वाट मात्र सजवली होती. 

 रात्र चढत गेलेली कळलीच नाही. काजव्यांनी अगदी वेडंपिसं करून टाकलं होतं.टेकवलीच्या अलिकडचं वळण तर कळसाध्यायच होता.रस्त्यालगत तीन झाडांनी गोलाकार फेर धरला होता . माथ्यावर त्यांच्या पाना - फांद्यांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा चतकोर. त्या तिन्ही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाडं पेटून उठली होती. कधी हे झाड तर कधी ते झाड.आणि अचानक आकाशातली अभ्रं दूर झाली आकाशाचा चतकोर चांदण्यांनी लखलखला . आणि कधी काळी ऐकलेली कविता आठवली . कुणाची ते नाही आठवत.

 'आकाशीचे तारे, सागरी प्रतिबिंबीत होती 
 किंवा आकाशी हे होती सागरीचे मोती 
 खरा कोणता सागर यातील वरती की खाली
 खरे तसे आकाश कोणते 
 गुंग माती झाली'

 इथं सागर नव्हता पण चांदणभरले आकाश वरती की खाली हा संभ्रम नक्की होता. 

 © Adv Seemantini Noolkar

शुक्रवार, १९ जून, २०२०


आमि एक जाजाबोर 

जाजाबोर म्हणजे जिप्सी ...फिरस्ता ..प्रवासी..स्थलांतर करणारा .जाजाबोर हा आसामी शब्द आहे ॰बंगाली भाषेत जाजाबोरला 'यायावर' म्हणतात.

प्रत्येक माणसाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतोच .स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांची आणि जाजाबोरची मानसिकता एक सारखीच असते .एका ठराविक काळानंतर अनुकूल हवामान, खाद्य यांची निर्माण होणारी गरज आणि पिल्लांना उडण्याचे -जगण्याचे ज्ञान देण्याची गरज , पक्ष्यांत एक अस्वस्थता निर्माण करते आणि स्थलांतराची उर्मि, त्यांना पंख पसरून झेप घ्यायला लावते.थोड्या खोल अर्थाने जाजाबोरचेही तेच असते .ठराविक काळानंतर नवीन जीवनानुभव  घेण्यासाठी , नव्या वाटा त्याला हाकारायला लागतात.नवे रस्ते, नव्या जगाची ओढ अनावर होते. 

अट्टल जाजाबोर ओळखायला अवघड नसतो. त्याची जिंददिली,खुशमिजाजी त्याच्या चेहर्‍यावरून, डोळ्यातून, देहबोलीतून छलकत  असते.तो कुठेही कसाही मिळून मिसळून जातो .जाजाबोर कुठेही गुंतत नाही .फिरस्त्यांशी सख्य जुळायला तर त्याला अजिबात वेळ लागत नाही  आणि निरोप घेतानाही  त्याची पावलं अडखळत नाहीत.अनाम, अनोळखी अनाघ्रात वाटांकडे  त्याची पावलं आपोआप वळतात॰

जाजाबोर रूळलेल्या वाटेवर रमत नाही .स्वतः च्या वाटा तो स्वतः रेखतो.पण जाजाबोरच्या फिरस्तीला एक लक्ष्य असते . त्याची फिरस्ती म्हणजे त्याचा स्वतः च शोध घेणं असतं ..एक अंतर्यात्रा असते.

जाजाबोर ही एक वृत्ती आहे.... उन्मुक्त, उत्कट , स्वछंदी ....ही वृत्ती म्हणजेच आवारगी . आवारा म्हटलं की उनाड , 'आवारा कहींका' असं काहीसं मनात येतं . पण गुलजारजी म्हणतात आवारगी म्हणजे  'आवारा कहींका'  नाही तर 'आवारा कहींका नही ' .

आवारा,आवारगी हे शब्द सहसा नकारात्मक अर्थाने वापरले जातात. पण  मोहसिन नक्वींची गझल ",ये दिल ये पागल दिल मेरा.....आवारगी" ,आवारगी मधली   romanticity  सांगते.आवारगी म्हणजे स्वत:त रमणे...to be with  oneself.

नक्वींसाब म्हणतात , अशी एखादी शाम ...शब असते ...कुणीतरी अनाम, अचानक हाकारतं..... 

"कल शब मुझे बेशक्ल की आवाजने चौंका दिया

मैने पूछा तू कौन है?

उसने कहा .... आवारगी "

मग त्या आवारगीचं काही ऐकून ...समजून घ्यावसं  वाटतं...हम लोग तो उक्ता गये कुछ   अपनी सूना  आवारगी .

जाजाबोर जरी स्वतः त रमलेला असतो तरी त्याच्या मनात एक अस्वस्थता, हुरहूर असते..एखादी वार्‍याची झुळूक मग त्याला हळूच विचारते 'काय होतय तुला?

'एक अजनबी झोंकेने  जब पूछा मेरे गमका सबब

सहाराकी भिगी रेतपर मैने  लिखा आवारगी ." काही होत नाहीय...आता वेध लागलेत.. नव्या दिशांचे ...नव्या वाटांचे...ती ही हुरहूर आहे.

जाजाबोरचा जीव अशा ठिकाणी अजिबात रमत नाही जिथे  स्वत:त रमण्याला  गुन्हा मानलं जातं  आणि जिथं अशा गुन्ह्याला  शिक्षा म्हणून शिक्का बसतो   आवारगीचा .

"लोगो भला उस शहरमे   कैसे जिये  हम जहा  हो जुर्म तनहा सोचना

लेकिन  सजा आवारगी"

जाजाबोरला त्याच मनोवस्थेत   अचानक स्वप्नात  'तनहा चाँद'  येतो  आणि त्याची उत्तरं त्याला मिळून जातात.तनहा चाँद पाहून त्याला मनोमन उमगतं....आवारगीच माझी फितरत आहे..   आवारगीच मला " रास "येते.

 "कल रात तनहा चांद को देखा था मैने ख्वाबमे 

मोहसिन मुझे रास आयेगी आवारगी "

ही आवारगी काही आजची नाही. काल्पनिकही  नाही.शतकानुशतकं  रक्तात भिनलेली आहे.या आवारगीत रमणार्‍या  जिप्सीना ,जाजाबोरना  "रोमानी "असंही म्हणतात.या रोमानींचं मूळ  भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतातच आहे. रोमानी मूळचे Paleolithic  Hunter  Gatherers.भारतावरच्या सततच्या   आक्रमणांमुळे रोमानीचे तांडे स्थलांतर करत मध्य आशिया, स्लाविया   आणि पूर्व यूरोप , ग्रीस, स्पेन, अमेरिकेचा काही भाग  असे जगभर पसरले..(ती आज एक ethnic  minority  आहे.)

या रोमानींचा   आत्मा ..Gypsy Soul...म्हणजे केवळ एक लय आणि मुक्त संगीताने भारलेला , अनिर्बंध मुक्त स्वातंत्र्याचे गाणे गात रहाणारा  असतो.नित्य बदलणार्‍या निसर्गाशी त्यांची नाळ जोडलेली  असते.त्यातूनच त्यांची जाजाबोर वृत्ती फुलते .  ही जाजाबोर वृत्ती सांसर्गिक असते , मनमुक्त उधळली जाते.

माझ्यात ही असा एक किंचित जाजाबोर आहेच .निसर्गात , रंगात, लोक कलात, लोकसंस्कृतीत  रमणारा. प्रवासाचं, नव्या अनुभवांचं  अनावर आकर्षण ,ओढ असणारा. ते सांगायचं ही असतं .

भूपेन  हजारिकांचे एक आसामी गीत आहे . ते माझ्यासाठी लिहिले असा मला  नेहमी वाटतं .जाजाबोर म्हणजे काय ते उलगडून सांगणारं'

मोई एती जाजाबोर .....आमि एक जाजाबोर ... मी एक फिरस्ता ... a  wanderer.

"मोई एती  जाजाबोर 

धोरार दिहिंगे दीपांगे लोरू 

निबिसारा निजा घोर "

मी एकटाच एकांतात भटकात असतो.

स्वतःचे घर (निजा घोर)असावे अशी ओढ मला कधी वाटलीच नाही.

भूपेनजी  या गीतात म्हणतात ,

'मी मिसीसीपी , वोल्गाचं  सौन्दर्य पाहिलय..

ओटावा , ऑस्ट्रीया,पॅरिसच्या मिठीत मी विसावलोय...

मी वेरूळचा शाही वारसा शिकागो मध्ये मिरवलाय ..

मी दुशानबेच्या मिनारात बसून गालिब ऐकलाय....

आणि मार्क ट्वेनच्या थडग्यावर बसून गोर्की बद्दल गप्पा मारल्या आहेत ....

प्रत्येकवेळी मला जाणवत गेलय  की फिरस्त्यांची   एकमेकांशी  फार लवकर जवळीक होते.

"बारे बारे देखू बाटोर मानुहू आपुन होईसे बोर

झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )

बर्‍याच भटक्यांच्या भटकण्याला उद्देश नसतो.लक्ष्याविहीन भटकंती असते ...पण माझे तसे नाही . माझ्याकडे काहीएक उद्देश आहे.

"बोहू जाजाबोर लोक्योविहीन

मुर पिसे आसे मात्र पोन"

मी अज्ञातातून जन्मलेल्या रंगांच्या खाणी पहातो..नुसत्या रंगांच्या खाणीच नाही तर निसर्गाची उधळान पहातो ,कलांचे आविष्कार पहातो,गीत संगीत ऐकतो॰

"रोंगोर खोनी जोते देखीसू .."

ते प्रत्यय मला सगळ्यांवर उधळायचे असतात .."भोगोई दियार मौन"

झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )

मी अनेक गगनचुंबी इमारती पाहिल्या ....

आणि त्यांच्या आडोशाला आसरा घेतलेले गृहविहीन नर-नारी ही पाहिलेत

घरासमोर बहरलेल्या बागा जशा पाहिल्यात

तशाच अवेळी गळुन पडणार्‍या  फूलपाकळ्याही पाहिल्यात 

"आरू देखीस मोरोहो फुलार पापोरी ओकेलाते पोरा झोरी "

आणि माझ्याच देशात , माझी जवळची माणसे परकी होताना  पाहिलीत

म्हणून मी एकेठिकणी फार थांबत नाही, रमत नाही. म्हणून मी एक फिरस्ता ,भटक्या,जाजाबोर...

 झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )


..आमि एक जाजाबोर ....आमि एक जाजाबोर

 

Adv Seemantini Noolkar


मोई एती  जाजाबोर....भूपेन  हजारिका ..आसामी गीत